Palm trees

Tuesday, October 31, 2006

"जम्बो" आत आणि "रावण" बाहेर

काय गोंधळून गेलात? तुम्हाला काही लक्षात आले का? अहो आजच्या एका वर्तमानपत्रातील हि ठळक बातमी आहे. आणि हो जम्बो तुम्हाला लक्षात यायला पाहिजे... चला मिच सांगतो, जम्बो म्हणजे आपला अनिल.. हो अनिल कुंबळेच! पण आता पुढची पंचायत आहे ना! हा "रावण" कोण........? येतंय का लक्षात? नाही येणार कदाचित कारण हे खुप कमी लोकांना माहित आहे कि, हे रमेश पोवारचे टोपणनाव आहे. अगदी विचित्र आहे हे सगळं! पण खरच मनापासून वाईट वाटत की आपल्या कर्णलसाहेबांनी(दिलीप वेंगसरकर) त्याला टिममधून काढलं.

Saturday, August 19, 2006

Sunday, August 06, 2006

प्रेम

प्रेमाच्या वेलीवर सर्वच फुले फुलतात असे नाही,
जीव जेवढा आपण लावावा......
तेवढा सर्वच लावतात असे नाही.

प्रेमासारख बंधन ज्याला सीमा नसतात हे आपण जाणतो,
पण प्रेमासारख्या बंधनाला सर्वच जाणतात असे नाही.

कुणीतरी म्हंटलय प्रेमामध्ये हातवरील रेशांनाही....
आपल्या वाटा बदलाव्या लागतात, पण त्या वाटा बदलेपर्यंत...
सर्वच थांबतात असे नाही.

Friday, August 04, 2006

प्रेमाचं BEVERAGE

CENTRAL NERVOUS SYSTEM माझी केलीस तु DAMAGE,
बदलुन टाकलीस तु माझी भोळीभाबडी IMAGE
कशाचीच नव्हती एवढी आता आहे तुझी CRAZE
आयुष्याचा माझ्या चालु आहे हा SENSITIVE PHASE
कुठेही पाहता दिसे मज फक्त तुझीच IMAGE
बोलायला तुझ्याशी आणतो मी उसनं COURAGE
तुझे प्रेम म्हणजे एक ALCOHOLIC BEVERAGE
सुंदर रंगीत पक्ष्याचे मखमली PLUMAGE
VALENTINE'S DAYला देशील म्हटलं सुंदरसं PACKAGE
नाही मिळालं काही तेव्हा हृदयास लावले BANDAGE
तुझ्यानंतर होणार नाही प्रिये कोणाशी ENGAGE
माझ्यासाठी रिता ठेव तुझ्या हृदयाचा PASSAGE
नाही माझा मोठा बंगला आहे छोटं COTTAGE
प्रेमामाखातर करशील का तू देत्यामध्ये MANAGE
चटकन दे होकर आणि भर आयुष्याचं PAGE
विलंब करु नकोस राणी होईल आमचं AGE....
होईल आमचं AGE...

साभार: मराठी मस्ती ग्रुप मैत्रीण

Thursday, August 03, 2006

लष्कर ए क्रिकेट


हिंदुस्थानी क्रिकेट संघ श्रीलंकेत खेळायला चालला आहे कि लढायला चालला आहे? वरील फोटो पहा.....
परवा बंगळूरच्या कॅम्पच्या वेळी हिंदुस्थानी खेळाडूंना सैनिकी शिक्षण दिलं.

Wednesday, August 02, 2006

दाखल होतेय आणखी एक मराठमोळी वाहिनी

निर्मात्या, कलाकार, दिग्दर्शिका कांचन अधिकारी आणखी एका मोठ्या जबाबदारीतून प्रेक्षकांपुढे येणार आहेत. "मी मराठी' या आगामी वाहिनीच्या त्या सर्वेसर्वा आहेत. पूर्णतः निःशुल्क असलेली ही वाहिनी सप्टेंबरपासून २४ तास प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. या वाहिनीविषयी...निर्मात्या, कलाकार, दिग्दर्शिका कांचन अधिकारी आणखी एका मोठ्या जबाबदारीतून प्रेक्षकांपुढे येणार आहेत. "मी मराठी' या आगामी वाहिनीच्या त्या सर्वेसर्वा आहेत. पूर्णतः निःशुल्क असलेली ही वाहिनी सप्टेंबरपासून २४ तास प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. "सब', "जनमत' आणि आता "मी मराठी' असा अधिकारी बंधूंचा छोटा पडद्यावरील प्रवास थक्क करणारा आहे. "आपल्या माणसांची आपली वाहिनी' असे या नव्या वाहिनीचे घोषवाक्‍य आहे. या वाहिनीच्या पूर्वतयारीच्या कामात कांचन अधिकारी सध्या गढून गेल्या आहेत. "क्‍लास आणि मास' या सर्व गोष्टींचा विचार करूनच त्याप्रमाणे मालिका व कार्यक्रम बनविण्यात येणार आहेत. "मोगरा फुलला', "दोष ना कुणाचा', "दावत', "दे दणादण', "धरलं तर चावतं सोडलं तर पळतं', "दोन फूल एक डाऊट फूल'... अशा काही मालिका व कार्यक्रम हे त्यांच्या वाहिनीचे प्रमुख आकर्षण आहे. "मी मराठी' वाहिनीमुळे अधिकारी बंधूंच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची नाडी अचूक ओळखून तशा प्रकारच्या मालिका बनविण्यात अधिकारी बंधूंचा हातखंडा राहिला आहे. बंदिनी, परमवीर, हॅलो इन्स्पेक्‍टर, दामिनी... अशा काही त्यांच्या मालिकांनी छोट्या पडद्यावर आपला वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांच्या मालिकांमुळेच किती तरी कलाकार नावारूपास आलेले आहेत. "मी मराठी' हे अधिकारी बंधूंचे छोट्या पडद्यावरील एक वेगळे पाऊल आहे. कांचन अधिकारी याबाबत म्हणतात, ""चोवीस तास मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी "मी मराठी' ही वाहिनी असावी ही कल्पना मुळात मार्कंड अधिकारी यांची; कारण तसं पाहायला गेले, तर अधिकारी बंधूंचे पहिल्यापासून मराठीवर प्रेम जडलेले आहे. "सब' व जनमत' या स्वतंत्र दोन वाहिन्यांचा अनुभव पाठीशी असल्यामुळेच "मी मराठी' वाहिनी लॉंच करण्याचा निर्णय घेण्यात आला. या चॅनेलच्या प्रोग्रॅम डिझायनिंगची सर्वस्वी जबाबदारी मी उचलली आहे. त्यात एकूण चार वयोगटांचा येथे प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. पहिला गट लहान मुलांचा असेल. दुसरा खास तरुणांसाठी, तिसरा मध्यमवर्गीय माणसांसाठी, तर चौथा वरिष्ठ नागरिकांसाठी. यामध्ये शहरी; तसेच ग्रामीण प्रेक्षकवर्गाचा विचार करण्यात आला आहे.''

Sunday, July 30, 2006

काल संध्याकाळी सहजच टि.व्हिचे चॅनल चाळत होतो. बातम्या बघण्याची खुप असल्याने NDTV चॅनलवर "मुकाबला" हा कार्यक्रम चालु होता, विषय होता "RSS आणि SIMI". पाहुणे होते भाजपाचे प्रकाश जावडेकर आणि सपा आणि इतर दोन मुसलमान नेते. पण हे कार्यक्रम बघत असताना एक गोष्ट सतत ते नेते दाखवून देत होते कि,SIMI पेक्षा RSS, भाजपा आणि शिवसेना या संघटना मुस्लीमविरोधी काम कसे करतात याच एका गोष्टीवर जोर देत होते. याचा अर्थ एकच होतो कि हे लोक एवढे सगळे बॉम्बस्फोट होऊन त्यात सिमीचा हात असल्याचे स्पष्ट होऊनही यांचा देशविरोधी कारवाया करत असलेल्या संघटनेलाच यांचा पाठिंबा असतो यांना देशद्रोही म्हणायचे कि देशसेवक? कारण आजपर्यंत असे ऐकिवात नाही कि RSS ने कधी देशविरोधी कारवाया केल्या आहेत. आज आपल्या देशात मुसलमानांचे मतांसाठी एवढे लांगुनलांचन होत आहे कि याचा फायदा आतंकवादी स्थानिक लोकांचा वापर करण्यासाठी करतात परिणामी त्यांना जेव्हा यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिस जातात तेव्हा तेथील स्थानिक राजकारणी आडवे येतात.
या सर्व गोष्टीवर एक निश्चित उपाययोजना आहे आणि ती म्हणजे आपल्या धर्मातील प्रत्येक मतदाराने मतदान करुन या मतांच्या राजकारणाचा पुर्णपंणे नायनाट करणे. य़ामुळे किमान अल्पसंख्यांक आणि बहुसंख्यांक हा फरकच निघून जाईल आणि ह्या आतंकवाद्यांना मदत करणारयांचे थोबाड फुटेल.

Sunday, July 16, 2006


रे छुमछुम पावसा ऽऽऽ, थोडी
तुझी उत्कटता दे, थोडं तुझं मनस्वीपण दे,
थोडं तुझं धुकं दे, थोडं तुझे मोहरणं दे, थोडा तुझा विश्‍वास दे आणि मग बघ गंमत!
सुळक्‍यासुळक्‍यावर बैठक मांडून
तुझ्याशी "केवढं! कसं! आणि किती!'
बोलतो ते...त्यासाठीच तर तुझ्या मिठीत विरघळण्याची ही ओढ!
पाऊस असा रुणझुणता
पैंजणे सखीची स्मरली!
पाऊल भिजत जाताना
चाहूल विरत गेलेली...
कसल्या तरी अलगद हुरहुरीची घुंगरं वाजवत येणाऱ्या छुमछुम पावसा।।। मला बोलायचंय तुझ्याशी काहीतरी.. खूप दिवस झाले. काही बोललोच नाही कुणाशी! तेंडुलकरांच्या "शांतता' मधली बेणारेबाई सारं असह्य होऊन शेवटी उठते, अंगाला आळोखेपिळोखे देऊन एक झक्कास आळस देत बोलू लागते - "खूप बोलायचंय मला! खूप वादळं आली- गेली, पण बोललेच नाही कुणाशी...' अगदी अशाच निळ्यासावळ्या रंगाचं बोलायचंय मला! ऐकशील? न ऐकशील? ठाऊक नाही! तसा लहरीच ना तू... कधी नको नको म्हणावं इतका वर्षाव, तर कधी अगदी आतड्यापर्यंत शोष जावा इतकं पाठमोरेपण! म्हणूनच तर जुळतं तुझं- माझं... आणि एकेकदा रागही असा येतो सणाणून... परवा असाच ताम्हिणी घाटातून गाडीने खाली उतरलो. अवतीभवती धुक्‍याची थप्पी लागून राहिलेली. शिवशाहीर असते तर म्हणाले असते, "एकवेळ मनातल्या धुक्‍यातून आरपार दिसेल, पण मावळच्या या धुक्‍यातून दिसणं बहुत मुश्‍कील.' तेव्हा गाडीच्या ताब्यात रस्ता देऊन टाकला आणि शांतपणे सी.डी. ऐकत राहिलो. सीडीवर "अख्तरी मॅडम'च्या गझलांचा तास चालू होता -
कुछ तो दुनिया की इनायात ने दिल तोड दिया
और कुछ तल्खि ए हालात ने दिल तोड दिया।
हम तो समझे थे के बरसात में बरसेगी शराब
आयी बरसात तो बरसात ने दिल तोड दिया।
तेव्हाच खरं तर गाडी थांबवून तुझ्याशी बोलणार होतो. एक विनंती पण करायची होती - आयुष्य सोपं करण्यासाठी हे आणि असे अनेक शेर गचांडी धरून कायमचे हद्दपार क रण्याचा बेत आहे माझा; त्या वेळी शक्‍यतो तुम्ही अनुपस्थित राहिलात तर बरं.. ही विनंती. हे असं काहीतरी लिहीत बसलेल्या खूप जणांना खिडकीतून पाहिले असशील ना तू.. अगदी कालिदासापासून गालिब, गुलजार, आरती प्रभूपर्यंत आणि अशा कितीतरी वेडबंबूंना हसलाही असशील ओठातल्या ओठात... ना? राग येतो तुझा; एकतर अशांना असलं काहीतरी सुचवत राहिलास म्हणून आणि दुसरं म्हणजे मला वगळून अशा क्षणांना साक्ष राहिलास म्हणून. भलतंसलतंच बोलत सुटलोय ना, छुमछुम पावसा? बोलायचं ते सापडत नाहीये आणि नुसताच तुझ्या "सर्वपणाने' गांगरून, चिडचिड करतोय का मी? मला माहित्ये रे, तुझा दोष नसतोच खरं तर. तू काय बिचारा उन्ह-वारा- पाण्याचा ताबेदार. आरती प्रभू म्हणाले, "पोर पाठ करी। समुद्राची जेव्हा। वाफ होई तेव्हा। ढग बने।।' तेव्हा कोटा भरला की बरसतोस अन्‌ ओसरून जातोस... खूप भरूनही न पाझरणाऱ्या, गुदमरल्या ढगाची गोष्ट ऐकली आहेस कधी?... बघ, पुन्हा पुन्हा आमची कथा आपली आमच्या जगण्याच्या मूळ पदाशीच यायची... आम्हाला सुचवायचं ते एवढंच -
मी धुकेही पाहिले अन्‌ धबधबेही पाहिले
पण तरी मी शेवटी माझाच फोटो काढला!
असो. वेळ संपली तरी अजून बोललो नाहीच मी काही! तेव्हा आता "व्यवस्थापूर्वकली' सुरवात करतो. थोडं त्या ताम्हिणी घाटातल्या तुझं कौतुक करतो! दुपारच्या "वामकुक्षी स्पेशल' मासिकातल्या लेखिका करतात, तसं तुझं वर्णन वगैरे... "बाहेर पावसाची संथ धार आणि मनात मात्र कसला तरी मुसळधार पाऊस' असं काहीतरी बोलतो! तिथल्या हवेतल्या अस्वस्थतेविषयी बोलतो. धबधब्याखाली आपोआप सुंदर दिसू लागलेल्या, काकडलेल्या तरुण पोरापोरींविषयी बोलतो! मनात अर्ध्या अर्ध्याच सांडलेल्या ओळींविषयी बोलतो... चालेल? मला माहित्ये तुला चालणार नाही. मुळात मी बोलावंच अशी काही सक्ती केलेली नाहीस तू आणि म्हणून असं वरवर बोलणं तुला आवडणारही नाही. तुझं रूपडं, तुझी हाक, तुझं धुकं, तुझा ध्यास, तुझी रिमझिम, तुझं धारानृत्य.. याला तुझा इलाज नाही; आणि ते पाहून वेडं होण्याशिवाय मला गत्यंतर नाही. कशालाच कसला इलाज नाही. प्रत्येक सरत्या पावसाळ्याबरोबर वय लहानच होत चाललंय माझं... पण मी थांबेन, वाट बघेन! तुला पाहताना नक्की काय होतं? कसं होतं? तुझ्यासोबत आणि तुझ्याविनाही सगळं जगणंच असं ओलंचिंब का होतं? हे सगळं सगळं पकडणारे शब्द नक्की सापडतील मला. खरंच. एऽऽ हसू नकोस.
"हाय! जिस शान से गरजा बादल।
काश, उसी शान से बरसा होता।'
असा तुझ्याच वरचा शेर मला ऐकवू नकोस. थोडी तुझी उत्कटता दे, थोडं तुझं मनस्वीपण दे, थोडं तुझं धुकं दे, थोडं तुझं मोहोरपणं दे, थोडा तुझा विषय दे आणि मग बघ गंमत. सुळक्‍यासुळक्‍यावर बैठक मांडून तुझ्याशी "केवढं! कसं! आणि किती!' बोलतो ते... त्यासाठीच तर तुझ्या मिठीत विरघळण्याची ही ओढ. भीती एकच आहे रे, छुमछुम पावसाऽऽऽ. ठाऊक आहे तुझ्याकडे बरसणारे डोळे आहेत आणि नाचणारी पावलंही; पण "ऐकणारे कान' नसतील, तर शब्दांची ती "चार थेंबुटी' समुद्रापर्यंत पोचायची कशी?