Palm trees

Sunday, July 30, 2006

काल संध्याकाळी सहजच टि.व्हिचे चॅनल चाळत होतो. बातम्या बघण्याची खुप असल्याने NDTV चॅनलवर "मुकाबला" हा कार्यक्रम चालु होता, विषय होता "RSS आणि SIMI". पाहुणे होते भाजपाचे प्रकाश जावडेकर आणि सपा आणि इतर दोन मुसलमान नेते. पण हे कार्यक्रम बघत असताना एक गोष्ट सतत ते नेते दाखवून देत होते कि,SIMI पेक्षा RSS, भाजपा आणि शिवसेना या संघटना मुस्लीमविरोधी काम कसे करतात याच एका गोष्टीवर जोर देत होते. याचा अर्थ एकच होतो कि हे लोक एवढे सगळे बॉम्बस्फोट होऊन त्यात सिमीचा हात असल्याचे स्पष्ट होऊनही यांचा देशविरोधी कारवाया करत असलेल्या संघटनेलाच यांचा पाठिंबा असतो यांना देशद्रोही म्हणायचे कि देशसेवक? कारण आजपर्यंत असे ऐकिवात नाही कि RSS ने कधी देशविरोधी कारवाया केल्या आहेत. आज आपल्या देशात मुसलमानांचे मतांसाठी एवढे लांगुनलांचन होत आहे कि याचा फायदा आतंकवादी स्थानिक लोकांचा वापर करण्यासाठी करतात परिणामी त्यांना जेव्हा यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिस जातात तेव्हा तेथील स्थानिक राजकारणी आडवे येतात.
या सर्व गोष्टीवर एक निश्चित उपाययोजना आहे आणि ती म्हणजे आपल्या धर्मातील प्रत्येक मतदाराने मतदान करुन या मतांच्या राजकारणाचा पुर्णपंणे नायनाट करणे. य़ामुळे किमान अल्पसंख्यांक आणि बहुसंख्यांक हा फरकच निघून जाईल आणि ह्या आतंकवाद्यांना मदत करणारयांचे थोबाड फुटेल.

Sunday, July 16, 2006


रे छुमछुम पावसा ऽऽऽ, थोडी
तुझी उत्कटता दे, थोडं तुझं मनस्वीपण दे,
थोडं तुझं धुकं दे, थोडं तुझे मोहरणं दे, थोडा तुझा विश्‍वास दे आणि मग बघ गंमत!
सुळक्‍यासुळक्‍यावर बैठक मांडून
तुझ्याशी "केवढं! कसं! आणि किती!'
बोलतो ते...त्यासाठीच तर तुझ्या मिठीत विरघळण्याची ही ओढ!
पाऊस असा रुणझुणता
पैंजणे सखीची स्मरली!
पाऊल भिजत जाताना
चाहूल विरत गेलेली...
कसल्या तरी अलगद हुरहुरीची घुंगरं वाजवत येणाऱ्या छुमछुम पावसा।।। मला बोलायचंय तुझ्याशी काहीतरी.. खूप दिवस झाले. काही बोललोच नाही कुणाशी! तेंडुलकरांच्या "शांतता' मधली बेणारेबाई सारं असह्य होऊन शेवटी उठते, अंगाला आळोखेपिळोखे देऊन एक झक्कास आळस देत बोलू लागते - "खूप बोलायचंय मला! खूप वादळं आली- गेली, पण बोललेच नाही कुणाशी...' अगदी अशाच निळ्यासावळ्या रंगाचं बोलायचंय मला! ऐकशील? न ऐकशील? ठाऊक नाही! तसा लहरीच ना तू... कधी नको नको म्हणावं इतका वर्षाव, तर कधी अगदी आतड्यापर्यंत शोष जावा इतकं पाठमोरेपण! म्हणूनच तर जुळतं तुझं- माझं... आणि एकेकदा रागही असा येतो सणाणून... परवा असाच ताम्हिणी घाटातून गाडीने खाली उतरलो. अवतीभवती धुक्‍याची थप्पी लागून राहिलेली. शिवशाहीर असते तर म्हणाले असते, "एकवेळ मनातल्या धुक्‍यातून आरपार दिसेल, पण मावळच्या या धुक्‍यातून दिसणं बहुत मुश्‍कील.' तेव्हा गाडीच्या ताब्यात रस्ता देऊन टाकला आणि शांतपणे सी.डी. ऐकत राहिलो. सीडीवर "अख्तरी मॅडम'च्या गझलांचा तास चालू होता -
कुछ तो दुनिया की इनायात ने दिल तोड दिया
और कुछ तल्खि ए हालात ने दिल तोड दिया।
हम तो समझे थे के बरसात में बरसेगी शराब
आयी बरसात तो बरसात ने दिल तोड दिया।
तेव्हाच खरं तर गाडी थांबवून तुझ्याशी बोलणार होतो. एक विनंती पण करायची होती - आयुष्य सोपं करण्यासाठी हे आणि असे अनेक शेर गचांडी धरून कायमचे हद्दपार क रण्याचा बेत आहे माझा; त्या वेळी शक्‍यतो तुम्ही अनुपस्थित राहिलात तर बरं.. ही विनंती. हे असं काहीतरी लिहीत बसलेल्या खूप जणांना खिडकीतून पाहिले असशील ना तू.. अगदी कालिदासापासून गालिब, गुलजार, आरती प्रभूपर्यंत आणि अशा कितीतरी वेडबंबूंना हसलाही असशील ओठातल्या ओठात... ना? राग येतो तुझा; एकतर अशांना असलं काहीतरी सुचवत राहिलास म्हणून आणि दुसरं म्हणजे मला वगळून अशा क्षणांना साक्ष राहिलास म्हणून. भलतंसलतंच बोलत सुटलोय ना, छुमछुम पावसा? बोलायचं ते सापडत नाहीये आणि नुसताच तुझ्या "सर्वपणाने' गांगरून, चिडचिड करतोय का मी? मला माहित्ये रे, तुझा दोष नसतोच खरं तर. तू काय बिचारा उन्ह-वारा- पाण्याचा ताबेदार. आरती प्रभू म्हणाले, "पोर पाठ करी। समुद्राची जेव्हा। वाफ होई तेव्हा। ढग बने।।' तेव्हा कोटा भरला की बरसतोस अन्‌ ओसरून जातोस... खूप भरूनही न पाझरणाऱ्या, गुदमरल्या ढगाची गोष्ट ऐकली आहेस कधी?... बघ, पुन्हा पुन्हा आमची कथा आपली आमच्या जगण्याच्या मूळ पदाशीच यायची... आम्हाला सुचवायचं ते एवढंच -
मी धुकेही पाहिले अन्‌ धबधबेही पाहिले
पण तरी मी शेवटी माझाच फोटो काढला!
असो. वेळ संपली तरी अजून बोललो नाहीच मी काही! तेव्हा आता "व्यवस्थापूर्वकली' सुरवात करतो. थोडं त्या ताम्हिणी घाटातल्या तुझं कौतुक करतो! दुपारच्या "वामकुक्षी स्पेशल' मासिकातल्या लेखिका करतात, तसं तुझं वर्णन वगैरे... "बाहेर पावसाची संथ धार आणि मनात मात्र कसला तरी मुसळधार पाऊस' असं काहीतरी बोलतो! तिथल्या हवेतल्या अस्वस्थतेविषयी बोलतो. धबधब्याखाली आपोआप सुंदर दिसू लागलेल्या, काकडलेल्या तरुण पोरापोरींविषयी बोलतो! मनात अर्ध्या अर्ध्याच सांडलेल्या ओळींविषयी बोलतो... चालेल? मला माहित्ये तुला चालणार नाही. मुळात मी बोलावंच अशी काही सक्ती केलेली नाहीस तू आणि म्हणून असं वरवर बोलणं तुला आवडणारही नाही. तुझं रूपडं, तुझी हाक, तुझं धुकं, तुझा ध्यास, तुझी रिमझिम, तुझं धारानृत्य.. याला तुझा इलाज नाही; आणि ते पाहून वेडं होण्याशिवाय मला गत्यंतर नाही. कशालाच कसला इलाज नाही. प्रत्येक सरत्या पावसाळ्याबरोबर वय लहानच होत चाललंय माझं... पण मी थांबेन, वाट बघेन! तुला पाहताना नक्की काय होतं? कसं होतं? तुझ्यासोबत आणि तुझ्याविनाही सगळं जगणंच असं ओलंचिंब का होतं? हे सगळं सगळं पकडणारे शब्द नक्की सापडतील मला. खरंच. एऽऽ हसू नकोस.
"हाय! जिस शान से गरजा बादल।
काश, उसी शान से बरसा होता।'
असा तुझ्याच वरचा शेर मला ऐकवू नकोस. थोडी तुझी उत्कटता दे, थोडं तुझं मनस्वीपण दे, थोडं तुझं धुकं दे, थोडं तुझं मोहोरपणं दे, थोडा तुझा विषय दे आणि मग बघ गंमत. सुळक्‍यासुळक्‍यावर बैठक मांडून तुझ्याशी "केवढं! कसं! आणि किती!' बोलतो ते... त्यासाठीच तर तुझ्या मिठीत विरघळण्याची ही ओढ. भीती एकच आहे रे, छुमछुम पावसाऽऽऽ. ठाऊक आहे तुझ्याकडे बरसणारे डोळे आहेत आणि नाचणारी पावलंही; पण "ऐकणारे कान' नसतील, तर शब्दांची ती "चार थेंबुटी' समुद्रापर्यंत पोचायची कशी?